आलापल्लीत अतिक्रमणामुळे शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

अहेरी, ३० मे २०२५: आलापल्लीच्या मुख्य चौकात रस्त्याच्या दुतर्फा अनियंत्रित अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना ये-जा करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यालगत दुचाकी, चारचाकी वाहने, खासगी प्रवासी वाहने आणि दुकानांचे अतिक्रमण यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. याच अतिक्रमणामुळे बुधवारी, २८ मे २०२५ रोजी सायंकाळी एका भीषण अपघातात शिक्षक शंकर गावडे (५५, रा. वेडमपल्ली, पेरमिली) यांचा जागीच मृत्यू झाला.
गावडे हे आपल्या पत्नीसह लग्न समारंभासाठी साहित्य खरेदी करण्याकरिता आलापल्लीच्या बाजारपेठेत आले होते. वाटेत मित्राशी गप्पा मारत असताना ते एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले. चहा पिऊन बूट पॉलिश करण्यासाठी ग्रामपंचायतकडे जात असताना मागून आलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गावडे यांचा जागीच मृत्यू झाला. मरपल्ली येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले गावडे हे चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे स्थायिक होते.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी या दुर्घटनेसाठी रस्त्यावरील अतिक्रमणाला जबाबदार धरले आहे. त्यांनी प्रशासनाकडे अतिक्रमण तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनीही यासंदर्भात प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळता येतील.