पत्रकारितेतून समाजसेवेचे ध्येय साध्य करा: परमानंद महाराज यांचे आवाहन

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या दोन दिवसीय केडर कॅम्पची कोकमठाण येथे उत्साहात सुरुवात
शिर्डी (प्रतिनिधी) ३१ मे: पत्रकारिता ही केवळ घटनांचे वृत्तांत सांगण्यापुरती मर्यादित नसून, समाजाला दिशा देणारी आणि सेवाभावी ध्येय साध्य करणारी शक्ती आहे, असे प्रतिपादन आत्मा मलिकचे प्रमुख परमानंद महाराज यांनी केले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने कोकमठाण येथील आत्मा मलिकच्या पावन भूमीत आयोजित दोन दिवसीय पत्रकार केडर कॅम्पचा शुभारंभ परमानंद महाराज, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख बिपीन कोल्हे यांच्या हस्ते झाला. या कॅम्पला राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारिता: समाज घडवणारी साधना
परमानंद महाराज यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पत्रकारिता ही एक साधना आहे. स्पर्धेच्या युगात पत्रकारांनी आपली मूल्ये आणि हेतू विसरता कामा नये. “बातमी मागची भूमिका समाजाला दिशा देणारी आणि सकारात्मक बदल घडवणारी असावी. संतांचे विचार, ध्यान आणि आत्मजागृती यांचा समावेश पत्रकारितेत झाला, तर ती अधिक प्रभावी होईल,” असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक पत्रकाराने दररोज १५ मिनिटे स्वतःसाठी द्यावीत, ज्यामुळे वैयक्तिक शांतीसह पत्रकारितेतील गुणवत्ताही वाढेल. “आत्मा म्हणजेच ती चेतना जी आपल्या कर्मात, विचारात आणि शब्दात प्रकट होते. शब्द हे राष्ट्रनिर्मितीचे साधन आहेत. ते अज्ञान नष्ट करू शकतात आणि लोकशाहीला सुदृढ करू शकतात,” असा मोलाचा संदेश त्यांनी पत्रकारांना दिला.
पत्रकारितेचा ऐतिहासिक वारसा
परमानंद महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारितेचा दाखला देताना लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, त्या काळात पत्रकारिता ही राष्ट्रीय उभारणीचे माध्यम होती. छपाईपासून डिजिटल लाइव्ह पर्यंत पत्रकारितेचा प्रवास प्रचंड बदलला असला, तरी दर्जा टिकवणे हे आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे. स्पर्धा, वेळेचे बंधन आणि तणाव यामुळे अनेकदा बातम्यांमध्ये विचार आणि मूल्यांचा अभाव जाणवतो. आत्मशोध आणि ध्यान यामुळे पत्रकारांना वैयक्तिक आणि व्यावसायिक स्थिरता मिळू शकते, असे त्यांनी ठासून सांगितले.
पत्रकार: समाजाचे दर्पण
संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी पत्रकारितेच्या जबाबदारीवर प्रकाश टाकला. “पत्रकारिता हा अत्यंत जबाबदारीचा व्यवसाय आहे. पत्रकार हे समाजाचे दर्पण असतात,” असे ते म्हणाले. महायुती सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. “मी त्यांचा शिलेदार म्हणून हे आश्वासन त्यांच्यापर्यंत पोहोचवेल,” असा विश्वास खताळ यांनी व्यक्त केला.
तंत्रज्ञान आणि पत्रकारिता
संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख बिपीन कोल्हे यांनी पत्रकारांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचा सल्ला दिला. “पत्रकार हा सत्य आणि खोट्याचे विश्लेषण करणारा असतो. ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात. तंत्रज्ञानाचा वापर करून सरकार आणि समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे कार्य
‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी केले. यावेळी समाजशास्त्र अभ्यासक प्रा. सविता गिरे पाटील, आत्मा मलिक ट्रस्टचे नंदकुमार सूर्यवंशी, विश्वस्त प्रदीप कुमार भंडारी, महाराष्ट्र भूषण व्यंकटेश जोशी, ज्योतिषाचार्य जयंत पारधी गुरुजी, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या आरोग्यसेल प्रमुख भीमेश मुतुला, महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी, सविता चंद्रे यांच्यासह राज्यभरातील पत्रकार उपस्थित होते.
या कॅम्पमधून पत्रकारांना आत्मशोध, तंत्रज्ञानाचा वापर आणि समाजसेवेच्या दृष्टिकोनातून पत्रकारितेची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.