झेंडेपार लोह प्रकल्पाला तीव्र विरोध: कोरचीत सरपंच संघटना आक्रमक, पर्यावरण आणि स्थानिक हक्कांचा प्रश्न उपस्थित

कोरची, दि. १ जून २०२५: गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील झेंडेपार येथे खाजगी कंपनीकडून प्रस्तावित लोह प्रकल्पाला ग्रामस्थ, सरपंच संघटना आणि पर्यावरणप्रेमी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. बिरसा मुंडा गोटुल भवनात आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच संघटनेचे विदर्भ अध्यक्ष संदिप ठाकुर आणि तालुक्यातील सर्व सरपंचांनी एकत्र येत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी, शेतीचे नुकसान आणि स्थानिकांच्या उपजीविकेला धोका निर्माण होईल, असा दावा त्यांनी केला.
पेसा कायद्याचे उल्लंघन:
झेंडेपार हे गाव पेसा कायद्याअंतर्गत येते, जिथे स्थानिक संसाधनांबाबत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार ग्रामसभेकडे आहे. मात्र, ग्रामसभेचा सल्ला किंवा मंजुरी न घेता प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यामुळे पेसा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सरपंच संघटनेने म्हटले आहे.
पर्यावरण आणि शेतीवर गंभीर परिणाम:
कोरची तालुका हा हिरवागार जंगलांनी समृद्ध आहे. झेंडेपार परिसरातही मोठ्या प्रमाणात झाडे असून, प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल होण्याची भीती आहे. यामुळे जैवविविधतेवर गंभीर परिणाम होईल आणि शेतीची जमीन बंजर होण्याचा धोका आहे. स्थानिकांची मुख्य उपजीविका शेती असल्याने हा प्रकल्प त्यांच्या जीवनावर थेट परिणाम करेल, असे सरपंचांनी नमूद केले.
सुरजागड प्रकल्पाचे दुष्परिणाम:
यापूर्वी सुरजागड लोह प्रकल्पाच्या ट्रक वाहतुकीमुळे कोरची मार्गे छत्तीसगडमधील भिलाई येथे होणाऱ्या वाहतुकीत गेल्या दोन वर्षांत १४ ते १५ नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबियांना कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप आहे. ही आकडेवारी झेंडेपार प्रकल्पामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या संकटांचे संकेत देते, असे सरपंच संघटनेने म्हटले आहे.
आंदोलनाचा इशारा:
कोरची तालुक्यातील सर्व सरपंचांनी एकजुटीने प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रकल्प तात्काळ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरपंच संघटनेने दिला आहे. सध्या तालुक्यात असंतोषाचे वातावरण आहे. पर्यावरण संरक्षण, शेतीचे भविष्य आणि स्थानिक हक्क यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
पत्रकार परिषदेला उपस्थिती:
पत्रकार परिषदेला तालुका अध्यक्ष धनिराम हिडामी, उपसरपंच टेमली, रमेश तुलावी (सरपंच, दवंडी), छायाताई बोगा (सरपंचा, अस्वलहुडकी), कौशल्या काटेंगे (सरपंचा, नवरगाव), इंदल कुमरे (सरपंच, नांगपूर), किशोर नरोटे (सरपंच, बिहिटेकला), मोहन कुमरे (उपसरपंच, जांभळी), चेतन किरसाण (सरपंच, बेडगाव), सुनील सयाम (सरपंच, मसेली), रवींद्र जांभुळकर (उपसरपंच, मसली), रविता हलामी (सरपंचा, कोहका), कुंती हुपुंडी (सरपंचा, बेतकाठी), रविता हिडामी (उपसरपंचा, सातपुती), ममता सहारे (उपसरपंचा, कोहका), प्रेमदास गोटा (उपसरपंच, अस्वलहुडकी), सुरेखा आचले (सरपंचा, नवेझरी), अविनाश हुमणे (सल्लागार, कोरची), विलास बावणे (सरपंच, कुलकुली), अविनाश कन्नाके (सरपंच, सुकाळा), विलास उसेंडी (सरपंच, भाकरोंडी), राजेश लिंगायत (सरपंच, किटाळी), उमाकांत हुलके (सरपंच, साखरा), शिवाजी गावडे (सरपंच, देवापुर), पुण्यवान सोरते (सरपंच, साखरा), प्रियंका कुमरे (सरपंचा, देलनवाडी), रंजीता पेंदाम (सरपंचा, मौशीखांब), कांता हलामी (सरपंचा, राजोली), अर्चना नंदेश्वर (सरपंचा, बाम्हनी), धर्मराज हरामी (उपसरपंच, चिगलटोला) यांच्यासह तालुक्यातील अनेक सरपंच आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.